Wednesday, September 22, 2010

प्रेमात पडलं की सारेच जण कविता...

प्रेमात पडलं की सारेच जण


कविता करायला लागतात

खरं सांगायचं तर थोडसं

वेड्यासारखंच वागतात.



यात काही चुकीचं नाही

सहाजिकच असतं सारं

एकदा प्रेमात पडलं की

उघडू लागतात मनाची दारं



मनातल्या भावना अलगद मग

कागदावरती उतरतात

डोळ्यांमधील आसवंसुद्धा

शब्द होऊन पसरतात



रात्रंदिवस तिचेच विचार

आपल्याला मग छ्ळू लागतात

न उमजलेल्या बरयाच गोष्टी

तेव्हा मात्र कळू लागतात.



डोळ्याशी डोळा लागत नाही

एकाकी रात्री खायला उठतात

ओठांपाशी थांबलेले शब्द

कवितेमधून बाहेर फुटतात



गोड गोड स्वप्नं बघत मग

रात्र रात्र जागतात

प्रेमात पडलं की सारेच जण

कविता करायला लागतात......

No comments: